छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कसा पुढे चालवणार?
हॉस्पिटलमधून परत येताना पाहिले, माझे एक परिचित गृहस्थ, त्यांच्या मित्रांसह उभे होते. सगळे जण एकमेकांना खेटून उभे होते. काही जणांचे, एकमेकांच्या गळ्यात हात होते. सदर परिचित गृहस्थ, छत्रपती शिवाजी महाराजांचे परम भक्त आहेत. मला घरी परतताना, महाराजांचे किल्लेदाराला लिहिलेले पत्र आठवले. मी शाळेत असताना, आमच्या मराठीच्या शिक्षिकांनी ते पत्र इतक्या छान पद्धतीने शिकवले होते की ते पत्र पण लक्षात आहे व त्यातील मतितार्थ! छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्लेदारास पत्रात बजावले होते: दिवसरात्र कडा सूक्ष्म पहारा ठेवा. तेलाच्या आमीषाने, उंदीर गडावरील दिव्यांतील तेलाची वात पळवतील. जर ती जळती वात धान्य_आगर किंवा शस्त्रागारावर पडली, तर अनर्थ होईल. धान्य_आगर पेटले व धान्य जळून खाक झाले तर सैनिकांना खायला काय देणार? उपाशी पोटी सैन्य कसे लढणार? तसेच शस्त्रागारावर जळती वात पडली व दारुगोळ्याचा स्फोट होऊन शस्त्रे नष्ट झाली तरी सुद्धा किल्ला राखायला जड जाईल. इतका सूक्ष्म विचार करणाऱ्या व सावध असणाऱ्या द्रष्ट्या महाराजांचे आपण नाव घेत असू, तर आपण किती सावध असायला हवे? आपण खरोखरच सूक्ष्म विचार करत आहोत काय?